मुख्य सामग्रीवर वगळा

सुखाची गुरुकिल्ली

 


श्री. कांबळे एस. जी. पाटोदेकर


जगी सर्व सुखी असा कोण आहे,

                            विचारी मना तूची शोधूनी पाहे.

या संत रामदास महाराजांच्या वचना प्रमाणे या जगात कोण सुखी आहे हे प्रत्येकाने आपापल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे. याचाच अर्थ या जगात कोणीही सुखी नाही. सुखाचे मूळ हे प्रत्येकाच्या फक्त धनात नसून ते मनात आहे.फक्त आचारात नसून ते विचारात आहे.

       ज्यांच्याकडे सुखाची गुरुकिल्ली आहे असा कोण आहे? सुख म्हणजे नेमकं काय असतं? सुख हे कोठे, केव्हा आणि कसे मिळते? सुख मिळवण्यासाठी नेमकं काय करावे? असे एक ना अनेक प्रश्न सर्वानाच पडले असतील, पडत असतील किंवा भविष्यात पडतील यात शंका नाही.

 आज जर खऱ्या अर्थाने विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की, प्रत्येक माणूस हा दुःखी असो व नसो पण तो मात्र सुखाच्या शोधात नक्की भटकतो आहे. सुखासाठी वाटेल ते करण्याची त्याची ही धडपड अहोरात्र चालू आहे. सुखासाठी काय केले पाहिजे. काय केले म्हणजे मी सुखी होईन. या सारख्या प्रश्नांनी प्रत्येकजण ग्रासलेला आपल्याला पाहायला मिळेल. या जगात कोण सुखी आहे असं जर कोणी विचारलाच तर याचे उत्तर समर्थ रामदास महाराजांच्या मनाच्या श्लोकात दिसते. तुम्हाला कोणीही सांगणार नाही की, मी आणि माझे कुटुंब सुखी, समाधानी आणि आनंदी आहोत. असं छातीठोकपणे बहुतेक कोणीही सांगताना दिसणार नाही. मी श्रीमंत, अतिश्रीमंत किंवा गर्भश्रीमंत आहे असं म्हणतील परंतु  सुखी, समाधानी, आनंदी आहे असं म्हणायला अजून ही कोणी तयार नाही. याचे कारण काय असेल याचा शोध अजून ही लागलेला नाही.

माझ्याकडे पैसा-अडका, जमीन-जुमला, सत्ता-संपत्ती, धन-दौलत, ऐश्वर्यसंपन्न असे वैभव आहे परंतु मी सुखी किंवा यात समाधानी आहे असं सांगताना दिसत नाही. प्रत्येकजण दुःखाचा पाढा वाचताना दिसतील.मला कुटुंब, मिञ परिवार, नातीगोती, सगेसोयरे सर्व काही आहे परंतु मी सुखी नाही बरेचजण हेच सांगताना दिसतील.परंतु सुखी आणि समाधानी आहे असं कोणीही म्हणायला तयार नाही.प्रत्येक जण म्हणतो की मला सुखी जीवन जगायचे आहे.मग प्रश्न असा पडतो की या सुखासाठी किंवा सुखी जीवनासाठी आपण काय केले पाहिजे? काय केले म्हणजे सुख मिळेल? आपण कधी सुखी होऊ.मला कधी आणि कशात सुखासह समाधान मिळेल. प्रत्येकजण याचाच शोध घेताना तुम्हाला दिसेल.

या सध्याच्या कलियुगात खरच सुख मिळेल की नाही मिळेल तर केव्हा, कूठे, कसे मिळेल याचा शोध चालू आहे. सुख ही काही वस्तू नाही की ती बाजारातून खरेदी करून घेता येईल. सुख हे प्रत्येकाच्या विचारावर आणि स्वतःच्या मानण्यावर अवलंबून आहे.

तुझ आहे तुझ पाशी

परी जागा चुकलाशी

या उक्ती प्रमाणे आपली प्रत्येकाची गत झाली आहे. सुखाच्या शोधात आपण आपला रस्ता चुकलो आहोत हे मात्र नक्की आहे. जसे मृग कस्तुरीच्या शोधात साऱ्या जंगलात भटकते आणि शेवटी दमून भागून तो एके ठिकाणी बसते तेव्हा त्याच्या लक्षात येतो की कस्तुरी तर आपल्या जवळच आहे आणि आपण सारं जंगल फिरलो.सर्व काही व्यर्थ गेले. तशीच आपली  प्रत्येकाची तशीच गत झाल्यासारखी वाटते.

सुख इकडे तिकडे कोठेही नसून ते आपल्या मध्येच आहे. त्याचा फक्त शोध घेता आला पाहिजे. संत वचनाप्रमाणे सुख दुसरं तिसरं काही नसून सुख म्हणजे समाधान. समाधानाच सुखाचे बीज आहे.सुख हे तुमच्या आमच्या मनात दडलेले आहे. सुख हे तुमच्या आमच्या विचारात दडलेले आहे. कोठेही जा, कितीही प्रयत्न करा, काहीही करा जो पर्यंत आपल्या मानतील तृष्णा जात नाही किंवा नष्ट होत नाही तो पर्यंत आपण सुखी होऊच शकत नाही. संत कबीर एके ठिकाणी असे म्हणतात की,

चिटी चावल ले चली

बीच में मिले दाल

कहे कबीर दो ना मिले

इक ले इक डाल.

म्हणजे तुम्ही आपल्या जवळ जे आहे त्यातच समाधान मानून  जगायला सुरुवात केली पाहिजे. आपण आहे त्यात समाधानी राहायला शिकल पाहिजे.त्यापेक्षा जास्त कसे आणि कुठे मिळेल याकडे आपला कल आहे. म्हणूनच आपण आज दुःखी असून सुख शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. लोभी कुत्रा ही कथा आपण सर्वांनी वाचली आहे, ऐकली आहे, नाहीतर विद्यार्थ्याना शिकवली सुध्दा आहे. त्यातून बोध मात्र घेतला नाही.सुख न मिळण्याचे कारण काय असेल तर ते म्हणजे तृष्णा होय. तृष्णा म्हणजे नक्की काय? तर तृष्णा म्हणजे आपल्या मनातील ईच्छा, हाव, आशा, आकांक्षा आणि अपेक्षा, कामना, भावना आणि वासना त्याच बरोबर आपल्या मनातील लोभ, मोह, माया, मद आणि मत्सर या या पुर्णपणे जाणार नाहीत तो पर्यंत तुम्हा आम्हाला सुख मिळणार नाही. तुम्ही आम्ही सुखी होणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. हे त्रिकालाबाधित सत्य आणि वास्तव आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. मग सुखासाठी काय करावं लागेल हा यक्ष प्रत्येकाला पडलेला आहे. त्याचे उत्तर मात्र साधे आणि सोपे आहे.पाहिले म्हणजे तृष्णा विरहित, निरपेक्ष, निस्वार्थी, साधे, सोपे जीवन जगणे आणि दुसरे म्हणजे जे आहे त्यात समाधान, आनंदी जीवन जगणे हीच आहे सुखाची गुरू किल्ली. लोभी कुत्र्याची गोष्ट आपण सर्वजण जाणता. आपली अवस्था ही तेल ही गेले आणि तूप ही गेले हाती धुपाटणे राहिले अशी झाल्यासारखी होईल.

म्हणून तुम्हा आम्हाला जर सुख पाहिजे असेल किंवा सुखी जीवन जगायचं असेल तर तृष्णा विरहित, निस्वार्थी, निरपेक्ष, शांत, समाधानी जीवन जगायला सुरुवात केली पाहिजे. या समाधानातच  सुखाची बीजे आहेत त्याचा शोध घेऊन आपलं जीवन सुखी आणि समृद्ध केले पाहिजे. समाधान हीच खरी आपल्या सुखाची गुरू किल्ली आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शैक्षणिक विकासामध्ये पालकांचे योगदान महत्त्वाचे

  श्रीमती खान तरन्नुम अब्बास जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा बेलापूर , ता. श्रीरामपूर, अहमदनगर मुलांच्या शैक्षणिक पायाभरणीत पालकांचे योगदान अतिशय महत्त्वाचे असून , बदललेल्या काळात तर योगदानाचे संदर्भही बदलले आहेत. उंचावलेल्या आर्थिक स्तरांमुळे अनेक घरांत सांस्कृतिक , सामाजिक व तांत्रिक बदल झालेले आहेत. एखादे शहर विकसित होताना त्या शहराची भविष्याची आव्हाने पेलणारी पुढची पिढी विकसित करायची असेल तर ही पिढी घडविणाऱ्या पालकांच्या पालकत्वाची चिकित्सा होणे आवश्यक आहे. आपल्याला एखादी पदवी मिळविण्यासाठी त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा लागतो. महाविद्यालयात जावे लागते , त्या विषयांच्या तासाला बसणे , क्रमिक पुस्तके वाचणे , संदर्भग्रंथ हाताळणे , परीक्षा देणे , ती उत्तीर्ण होणे हे सर्व टप्पे गाठावे लागतात. दुर्दैवाने पालक होण्यासाठी यापैकी काहीही करावे लागत नाही. शास्त्रशुद्ध अभ्यास , बालमानसशास्त्र , मेंदूच्या जडणघडणीचा प्रवास , लहान मुलांच्या शिकण्याच्या प्रेरणा , नवनवीन ज्ञान ग्रहण करण्याच्या क्षमता , अनुकरणशीलता , संस्कार व मूल्य यांचा आयुष्यावर पडणारा प्रभाव , टीव्ही व मोबाइलचा ग्रहण...

‘महाराष्ट्र’ नाव कसे पडले?

  शिवकन्या एन. कदेरकर-कोंजारी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन  मंडळ , बालभारती , पुणे सदस्य व सहशिक्षिका मॉर्डन हायस्कूल , सोलापूर                          महाराष्ट्र या नावातच महानता दिसून येते महा मोठे महान असे हे राष्ट्र होय म्हणूनच जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हे ऐकताना किंवा गाताना अभिमानाने मान ताठ होते ऊर भरून येतो डोळ्यात एक चमक येते. संतांचा देश दऱ्याखोऱ्या आमचा देश शूरवीरांचा देश यासारख्या अनेक नावाने सुपरिचित असणाऱ्या महाराष्ट्राचे नाव महाराष्ट्र कधी कसे पडले याबाबत मात्र अनेक विचार प्रवाह दिसून येतात. प्राप्त झालेले हे नाव लोक वाचत आहे की देश वाचक याबाबत ही प्रश्नचिन्हच आहे. इतिहासाचे अभ्यासक चि. वि. वैद्य यांच्या मते इसवी सन पूर्व ६०० च्या सुमारास दक्षिण भारतात गोपराष्ट्र ,   पांडुराष्ट्र व मल्ल राष्ट्र इत्यादी वसाहती होत्या त्यातीलच मल्लराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र होय. तसेच इतिहासाचे अभ्यासक रा. गो. भांडारकर यांच्या मते दक्षिणेतील रठ्ठ लोका...